romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, May 21, 2012

एक मंदिर..

एक मंदिर
शहराच्या मध्यभागातलं.. तळ्याच्या पार्श्वभूमीवरचं.. त्याची रचना करतानाच सगळं लक्षात घेऊन रचना केलेली.. प्रवेश कमानीतून आत शिरतानाच मंदिराचं लांबवर दिसणं.. स्वच्छ तळं.. पांढर्‍या शुभ्र इमारतींचा भोवताल.. केवढा मोठा परिसर.. तो सतत तसाच शुभ्र ठेवणारे सतत राबते स्वयंसेवक.. ध्वनिक्षेपक चालू पण ते प्रसारित करतात फक्त गायली जाणारी संयत सुरातली भजनं.. गर्दी पण नकोसा रेटा नाही. रांगेत सारं व्यवस्थित. आपलेच लोक रांगेत गजबज करणारे (पुण्याबिण्याकडच्या भक्तीणी?) बराच वेळ वाट बघून एक वृद्ध भक्त सरदारजी त्याच्या मागे उभ्या असलेल्या तरूणाला मला सांगायला सांगतो, त्या नको तिथे नको त्या गप्पा मारून शांततेचा भंग करणार्‍याना कृपया गप्प बसायला सांगा. आम्ही खूप लांबून दर्शन घ्यायला आलो आहोत. महिलांना ते सांगितल्यावर त्या चिडीचूप. अमृतसरच्या स्वर्णमंदिर अर्थात हरमंदिरसाहिबचं पहिलंच दर्शन प्रचंड सुखावणारं. प्रवेश घेतानाचीच वहातं पाणी असलेली कृत्रिम घळ. त्यात पाय बुडवून त्यापुढच्या लांबलचक हिरव्या काटेरी पायपुसण्यावर पाय पुसून कमानीत शिरायचं. तरीही पायाला राहिलेल्या पाण्याने अस्वच्छ होणार्‍या संगमरवरी पायर्‍या तत्परतेने पुसणारे सेवक/सेविका. कमानीतल्या उतरत्या पायर्‍यांवरून समोर लांब दिसणारं, तळ्यातलंच वाटणारं लोभसवाणं स्वर्णमंदिर. लांबलचक रांग तरीही शिस्तीत उभी राहिलेली जनता. कानावर पडणारं भक्तिरसपूर्ण गायन. वाटेत, मंदिरात, आत कुठेही कुणाच्या तसबिरी नाहीत, हे ह्यानं दिलं, ते त्यानं असा जिथे तिथे असणारा उल्लेख नाही. मला सगळ्यात आवडलेलं वैशिष्ट्य शीखपंथाचं ते म्हणजे त्यांचा सर्वेसर्वा गुरूग्रंथसाहिब! विविध शीखगुरूंनी संपादित केलेला ग्रंथ सर्वोच्चपूजनाचं स्थान ठरणं यातच केवढी सूचकता आहे, नाही? कुठल्याही गुरूची तसबीर, त्याच्या जीवितकार्याचा तपशील मंदिरात कुठेही दिसत नाही याची त्याला जोड! खरंच नतमस्तक व्हावसं वाटलं. तळमजल्यावरची समाधी, वरच्या मजल्यावरचा भलाथोरला गुरूग्रंथसाहिब आणि त्याशेजारचं अकाल तख्त याखेरीज लंगर इत्यादी प्रत्यक्ष बघायला मिळालं नाही.
आत शिरल्यावर एक कचकच, एक सलसुद्धा मनाला बोचत होता. तो होता ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा! कारणं काहीही असोत अशा पवित्र ठिकाणी प्रचंड नरसंहार झाला. त्यातून आणि काय काय उद्भवत गेलं.. खूप वाईट वाटलं..
आज बघताना सारं चित्र कसं छान दिसतंय पण अकाली-निरंकारींमधल्या दंगली आणि खलिस्तान चळवळीने घेतलेलं उग्र रूपही यामागे आहे ह्याचा विचार अस्वस्थ करतो. धर्म म्हटला की त्याचा अतिरेक करायचाच असं काहीतरी आपल्या देशाचं विधीलिखित आहे का?  

No comments: